वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदीनागरिकांनी घरातच थांबण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन #Wardha #संचारबन्दी

वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी
नागरिकांनी घरातच थांबण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

वर्धा, दि 19 फेब्रुवारी (जिमाका): वर्धा शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता वर्धा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवार 20 फेब्रुवारी रात्री 8 ते सोमवार 22 फेब्रुवारी  सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी राहणार आहे. नागरिकांनी काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. 

संचारबंदीच्या काळात काय बंद राहील 
सर्व बाजारपेठ , मॉल्स,  कॉम्प्लेक्स  येथील सर्व दुकाने  (  वेद्यकीय सेवा  वगळता) बंद राहतील. सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. चहा,मिष्ठानन प्रतिष्ठान, पानटपरी व इतर वस्तु विक्री, जिवनावश्यक व बिगर विनावश्यक वस्तूची दुकाने सुध्दा बंद राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खाजगी बसेस, खाजगी  वाहतूक, एस. टी. बसेसची सेवा तसेच नगरपालीका हद्दीतील व जिल्हयातील ऑटो रिक्षा ची सेवा नागरिकांसाठी बंद राहील.  वर्धा शहर व ग्रामीण भागातील  सर्व पेट्रोल, डिझेल पंप निर्देशाप्रमाणे बंद राहतील. 

व्यायाम शाळा, जीम,जलतरण तलाव सुद्धा बंद राहतील.शासकीय व खाजगी वाचनालये ग्रंथालय, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, वाहन दुरुस्ती गॅरेज, सर्व प्रकारची बांधकामे, कटिंगची दुकाने, सलून, ब्यूटी पार्लर हे संचारबंदी कालावधीमध्ये बंद राहतील, वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्ड हे सुध्दा या कालावधीत बंद राहील. 

पर्यटन स्थळे, उद्याने, बगीचे, पार्क, मनोरंजन पार्क, ऐतीहासीक स्थळे तसेच ग्रामीण भागात असलेली सर्व वन पर्यटन स्थळे बंद राहतील, पर्यटन स्थळी नागरीकांनी गर्दी करु नये अन्यथा त्यांचेवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. वर्धा शहर व ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँक,खाजगी बँक, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व
वित्तिय संस्था बंद राहतील. चित्रपटगृहे, सिनेमागृहे, नाट्यगृहे  बंद राहतील. विविध क्रिडा संस्था, प्रशिक्षण केंद्र, सर्व प्रकारचे आंतरमैदानी व बाहय मैदानी खेळ या कालावधीत बंद राहतील.

हे सुरू राहील
जीवनावश्यक वस्तूचा समावेश असलेली दुध डेअरी व दूध विक्रीची  दुकाने ही संचारबंदीच्या कालावधीमध्ये सकाळी 6 ते सकाळी 10, सायंकाळी 6 ते रात्री 10  पर्यंत सुरु राहतील. जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणारे ट्रक मोटार व रिक्षा वाहने यांची  सेवा सुरू राहील. 

आपातकालीन परिस्थितीत व रुग्णांच्या सेवेसाठी  ऑटो रिक्षाची सेवा व स्वत: चे खाजगी वाहनाची सेवा घेण्याची मुभा राहील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात वाहतुकीच्या सेवा सुरु राहतील.  
 वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची औषधी दुकाने, औषधालये, रुग्णालये,नर्सिंग होम, क्लिनिक, औषधी व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, तसेच अधिकृत खाजगी वैद्यकीय आस्थापना ज्या कोविड-19 च्या आवश्यकतेच्या सेवा तरतुदीसाठी आहेत, त्या सर्व सुरु राहतील.अत्यावश्यक सेवा अंतर्गत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी अंतर्गत विज सेवा, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण/नगर परिषद/पालीका अंतर्गत पाणी पुरवठा सेवा, गॅस सेवा, रोडदुरुस्ती, नाले सफाई सुरु राहतील.प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, डिटीएच, केबल सेवा, वृत्तपत्रे सेवा (छपाई, विक्री व वितरण) सुरू राहतील व त्या संबंधित असलेले  पत्रकार यांना त्यांच्या कामाकरीता संचार करण्याची परवानगी राहील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत असलेली सर्व औद्योगिक आस्थापना हया त्यांचेकडील मजुरांसह सुरु राहतील. याबाबतची कार्यवाही  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी करतील. 

वर्धा शहर व जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्रीत जमू नये, अनावश्यकरित्या कोणत्याही नागरीकांनी  शहरात व गावात फिरु नये असे आवाहन करण्यात आले असून  संचारबंदी कालावधीत शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस विभागाने वर्धा जिल्हयाच्या सिमेवर वाहनांकरीता नाकेबंदी करून तपासणी करावी व अनावश्यकरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी. विनाकारण चारचाकी व दुचाकी वरुन वाहतूक करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 व्या कलम 188 अनवये  शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. अशा व्यक्ती. संस्था, संघटना यांचवर गुन्हे दाखल करण्यासाठी मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत, सचिव, ग्रामपंचायत यांना व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना कार्यवाही करण्याकरीता प्राधिकृत करण्यात आले  आहे.