दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा #Education #10th&12th #महाराष्ट्रसरकार

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे, असं सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी तयार करत आहे.
प्रश्नपेढ्या कुठं उपलब्ध होणार?
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.