बालकांची काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे न्याय हक्क व यथायोग्य संगोपन होणार task Force covid

बालकांची काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत 

 कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे न्याय हक्क व यथायोग्य संगोपन होणार 

 चंद्रपूर दिनांक 18 मे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. 

कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमावले आहेत.
त्यांना संरक्षण मिळावे  तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत, याची दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेतली जात आहे. याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या 7 मे च्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मनपा उपायुक्त अशोक गराटे, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड.वर्षा जामदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर,
सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, 
विभाग प्रमुख शासकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय डॉ.निशिकांत टीपले,  महिला व बाल विकास जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर, संदीप कापडे, सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी टास्क फोर्समधील सदस्यांची बैठक घेऊन बालकांच्या संरक्षण व काळजी बाबतच्या कामकाजासंदर्भात  आढावा घेतला. नागरिकांनीही अशा बालकांची माहिती असल्यास चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले. 

जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाने दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे काळजी व संरक्षणाची तसेच दोन्ही पालक कोविड  संसर्गामुळे दवाखान्यात दाखल असल्यास आणि बालकांना बालगृहात दाखल केले असल्यास त्यांची माहिती
दिलेल्या तक्त्यात सादर करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सदर यंत्रणेला दिल्या.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत कोविड संसर्गामध्ये अडचणीत सापडलेल्या शून्य ते 6  व 6 ते 18 वयोगटातील बालकांच्या मदतीसाठी  जनजागृती पर माहिती पत्रकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.