कोरोना फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना सुरू: जिल्हाधिकारी डॉ. खेमनार

Ø  चंद्रपूरची महाकांली यात्रा स्थगीत करण्याचे आवाहन

Ø  प्रत्येक गावात तपासणी टिम तयार करणार 

Ø  अनावश्यक विदेशवारी न करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 12 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 विदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे त्यांच्यामध्ये कोणतेही कोरोना विषाणू आढळले नाहीत. जिल्हा प्रशासन विदेशी पर्यटक, तसेच कोणत्याही रुग्णांमध्ये अशा प्रकारची लक्षण आढळल्यास त्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तत्पर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संसर्ग अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हाभर करण्यात येत असून यासाठी चंद्रपूरची सुप्रसिद्ध महांकाली यात्रा स्थगित करण्याबाबत, आवाहन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्याप्रमाणात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनाचा आढावा आज एका उच्चस्तरीय बैठकीद्वारे घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक निर्णय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

कोरोना संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवण्यात येत असून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये 11 मार्च 2020 पासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी या आजाराबद्दल कोणतीही अफवा पसरू नये.

जिल्ह्यात येणाऱ्या काळामध्ये कोणतेही सण, उत्सव साजरे करताना मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील काही कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी महिनाभराची माता महाकाली यात्रा सुद्धा स्थगित करण्याबाबतचे आवाहन समितीला करण्यात आले आहे. या यात्रेला तेलंगाना मराठवाडा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सार्वजनिक उपक्रम टाळण्याचे राज्यस्तरावरून निर्देश असल्यामुळे व कोरुना प्रतिबंध करण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी शक्यतो एकत्रित येण्यासाठीच्या असणाऱ्या कोणत्याही सण उत्सवात सहभाग टाळणे आवश्यक आहे. नाट्यगृह, सिनेमागृह याठिकाणी आणि या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुढील काही दिवस  गर्दीत जाणे टाळणे योग्य राहील, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या आजाराचा प्रसार वरिष्ठ नागरिकांमध्ये झपाट्याने होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी व सामान्य नागरिकांनी देखील पुढील काही काळात अनावश्यक प्रवास टाळणे योग्य राहील. शाळांमधील मोठे कार्यक्रम, हॉटेल, मॉल, बाजार, यात्रा, उरूस, जयंती,पुण्यतिथी व वाढदिवस स्नेहभोजन उत्सवाच्या कार्यक्रमांना आपापल्या स्तरावर काही प्रमाणात लगाम घालने अतिशय आवश्यक असून प्रत्येक कुटुंबाने यासंदर्भात जागरूक रहावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्रात नागपूर, पुणे व मुंबई या ठिकाणी विदेशातून येणाऱ्या नागरिकांना अनिवार्यपणे यासंदर्भातील तपासणीसाठी चौदा ते पंधरा दिवस आरोग्य विभागाचे निगराणी ठेवण्यात येते. त्यामुळे विदेशात जाणे अथवा विदेशातून येणे, थोडक्यात विदेशवारी या काळामध्ये टाळावी,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बस स्थानक, रेल्वे स्थानक, मंगल कार्यालय व गर्दीच्या अन्य ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता राखणे कोरोना आजाराचा प्रसार-प्रचार होण्यापासून मज्जाव करणे होय.त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगावी, आरोग्य व स्थानिक यंत्रणेला यासंदर्भात कोणतीही अफवा असल्यास दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या शून्य आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज घेतला आहे. त्यामुळे जिल्हयातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यात येत आहे. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे. त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे, असे निर्देश देण्यात आले आहे आहेत. शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली. ताडोबा येथे विदेशी पर्यटकांना प्रतिबंध घालण्याबाबत शासन विचार करत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या तपासणी बाबतही सूचना दिल्या असून त्यावर निगराणी ठेवली जात आहे.

चंद्रपूर शहरातील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली पाहिजे. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेतला जात आहे.  चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून 15 फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहे त्यांना सक्तीने 15 दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना राज्यभर देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे 100 टक्के क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर व परिसरात कोणी विदेशातून आल्यास त्याची माहिती योग्यप्रकारे जिल्हा प्रशासनाला द्यावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे.

जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा. पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत सर्व संस्थांना विनंती करण्यात येत आहे.

जनतेने कोरणा-या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रथम प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी व एखादी व्यक्ती कोरोना बाधित देशातून किंवा क्षेत्रातून आली असेल किंवा अशा प्रकारचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे तात्काळ संपर्क साधावा तसेच राज्य स्तरावरील संपर्क कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२७३९४, टोल फ्री क्र. 104 वर संपर्क साधावा.जिल्हयासाठी  ०७१७२-२६१२२६  हा क्रमांक 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे.