कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकतंत्र की आवाज
मुंबई 11 मार्च : राज्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची प्रकृती स्थ‍िर;विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क
राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थ‍िर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.  नागरिकांनी सामूहिक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबिण्याची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या.