चंद्रपूर जिल्ह्यात पुढचे काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे आवाहन , जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली



 

     
      जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

     नवीन 23 नमुन्यांपैकी 15 नमुने निगेटिव्ह

    8 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले

   उद्रेकाच्या काळातील संभाव्य परिस्थितीसाठी सर्व तालुक्यात मॉकड्रिल घेणार

    जिल्हा सहायता निधी मध्ये दानशूरांकडून ओघ वाढला

   जिल्ह्यात 12 ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था

   जिल्ह्यात 3344 भोजन थाळीचे वितरण

   41 शेल्टर होममध्ये 638 बेघरांना निवारा

   कम्युनिटी किचन मार्फत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 15 हजारावर लोकांना भोजन

  गावागावातील नागरिक झाले आहेत गावांचे रक्षक

चंद्रपूर, दि. 09 एप्रिल  (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या गावांमधील नागरिकांनी स्वतःच्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी देखील आजूबाजूच्या आजारी व संशयित रुग्णांना बाबत जागरूकता बाळगावी. वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी. सध्या जिल्ह्यात एकही ही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

        जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.

      संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लोकांना अटक करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या 96  लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 215 वाहने ताब्यात घेण्यात आले असून 4 लाख 42 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने गरजेसाठी आठवड्यातून एकदाच बाहेर पडण्याची सवय लावावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा प्रशासनाला एकीकडे आरोग्य यंत्रणा बळकट करताना दुसऱ्या बाजूने लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या दुसऱ्या राज्यातील व जिल्ह्यातील शेकडो लोकांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांसह प्रमुख शहरांमध्ये 41 निवारा कक्ष उघडण्यात आले आहे.यामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या राहण्याची अंथरूण-पांघरूणाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

      यासोबतच जे बेघर आहेत. विमनस्क, एकटे व ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची यंत्रणाच नाही, अशा नागरिकांसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्या मदतीने महानगरपालिकेच्या नियोजनात कम्युनिटी किचनच्या माध्यमातून रोजच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

      आरोग्य विभागाचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन 23 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 15 नमुने निगेटिव आहेत. 8 नमुन्यांचा अहवाल अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बाहेर देशातून व अन्य राज्यातून ,अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 हजार 536 आहे. सध्या निगराणीमध्ये असणाऱ्या प्रवाशांची संख्या 6546 आहे. 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 19 हजार 990 आहे. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईनची संख्या 20 आहे. आरोग्य विभागांचा जिल्ह्यामध्ये कसून सर्वे सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.