लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्‍वरित माफ करावी – आ. सुधीर मुनगंटीवार , मागणी मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तिव्र करणार #SudhirMungantiwar

लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्‍वरित माफ करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

मागणी मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तिव्र करणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात बल्‍लारपूरात राज्‍य सरकाच्‍या विरोधात आंदोलन
 
22 मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. 1 एप्रिल पासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. 0-100 या स्‍लॅब मध्‍ये सुध्‍दा वाढ करत राज्‍यातील जनतेवर अन्‍याय केला. लॉकडाऊनच्‍या काळातील गरीबांची वीज बिले माफ करावी या मागणीसाठी आम्‍ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्‍पा आहे. ही मागणी पुर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असून सरकारने वीज बिल माफ केले नाही तर आम्‍ही आंदोलन अधिक तिव्र करु, असा इशारा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

दिनांक 17 जुलै 2020 रोजी बल्‍लारपूर येथे भाजपातर्फे राज्‍य सरकारच्‍या निषेर्धात आयोजित आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, नगराध्‍यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सौ. रेणुका दुधे, काशिसिंह, मनिष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेट्टी, सौ. मिना चौधरी, राजु दारी, कनकम कुमार, समिर केने, आशिष देवतळे, बुचय्या कंदीवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले ज्‍या जिल्‍हयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. त्‍या जिल्‍हयात रमाई आवास योजनेसाठी 7500 घरकुलांना मंजुरी देण्‍यात आली होती. मात्र या सरकारने यासाठी आवश्‍यक 53 कोटी रुपयांचा निधी अद्याप दिलेला नाही. आपल्‍या श्रध्‍दास्‍थानांची किंमत ज्‍या सरकारला नाही, त्‍या सरकारकडून जनता अपेक्षा तरी काय करणार. रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्‍हयाकरीता 53 कोटी रुपयांचा निधी राज्‍य शासनाने त्‍वरित द्यावा अशी मागणी त्‍यांनी यावेळी बोलताना केली. आमचे सरकार राज्‍यात असताना आम्‍ही कधीही रडत बसलो नाही. या जिल्‍हयासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपण आदरपुर्वक घेतो. त्‍यांच्‍या राजगृह यांच्‍या निवासस्‍थानावर दगडफेक करणा-यांना हे सरकार अटक करु शकत नाही. या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. 2515 या लेखाशिर्षा अंतर्गत 1600 कोटी रुपयांचा निधी दिला मात्र  गरिबांच्‍या वीज बिलासाठी या सरकार जवळ पैसे नाहीत, आरोग्‍य सुविधांसाठी पैसे नाहीत, ज्‍यांच्‍या जवळ रेशन कार्ड नाहीत त्‍यांना धान्‍य देण्‍याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मात्र राज्‍य सरकारने यासाठी काहीच केले नाही. सरकारचे 1 लाख कोटी जमा आहेत, तरीही सरकार पैसे नाही म्‍हणुन कायम रडताना दिसते. आम्‍हाला लढणारे सरकार अपेक्षित आहे, रडणारे नाही. राज्‍यात शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झाला आहे. कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळाला नाही, कर्जाचे पुर्नगठन झाले नाही. खतांचा प्रचंड तुटवडा शेतक-यांना जाणवत आहे. हे सरकार निष्क्रिय आहे. लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांची वीजेची बिले त्‍वरित माफ केली नाही तर शासनाच्‍या विरोधात अधिक तिव्र स्‍वरुपाचे आंदोलन आपण छेडणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. आंदोलनात भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्‍टंसिंग पाळून सहभागी झाले होते.