अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला!, मुख्यमंत्री आणि वनमंत्री संजय राठोर यांच्यात नेमकं काय घडलं ? #SanjayRathore #राजीनामा

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला!,  मुख्यमंत्री आणि वनमंत्री संजय राठोर यांच्यात नेमकं काय घडलं ?

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. 

वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. राठोड आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली होती. यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी साधारण पाऊण तास या चौघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी संजय राठोड यांनी राजीनामा देतो पण तो स्वीकारला जाऊ नये, अशी विनंती केली होती.

राठोड यांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असं मत शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. माध्यमांना मला उत्तरं द्यायची आहेत, विरोधी पक्षाला उत्तर द्यायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.