मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्र राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांनी याकरिता प्रधानमंत्र्यांचे आभार मानले #CMThakre #PMModi

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; 

राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला

मुख्यमंत्र्यांनी याकरिता प्रधानमंत्र्यांचे आभार मानले 

मुंबई, दि २४ अप्रैल: महाराष्ट्र राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, 21 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.