ई-पासची अट रद्द, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातही ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम #epassmaharashtra #महाराष्ट्रसरकार

ई-पासची अट रद्द, महाराष्ट्र सरकारचा 
मोठा निर्णय

महाराष्ट्रातही ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम

मुंबई, 31 अगस्त: महाराष्ट्र राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो सेवा, सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था यांना अंशत: परवानगी दिली. तसंच राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कोणत्या सवलती देता येतील याचा आढावा घेण्यात आला होता.

दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

राज्य सरकारने खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही.