दिवाळीत विक्रीसाठीच्या मिठाईवर उपयोगात आणण्याची अंतिम तारीख आवश्यक – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे #DrRajendraShingane

दिवाळीत विक्रीसाठीच्या मिठाईवर उपयोगात आणण्याची अंतिम तारीख आवश्यक – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. 12 नोवेम्बर: दिवाळीत तयार होत असलेली  मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्यावर  ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्ही तारखा असणे  बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. जनतेला सकस आणि चांगले अन्न दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष असल्याचे  अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे  यांनी सांगितले.

डॉ. शिंगणे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावर कोरोना महामारीचे संकट असून अजूनही ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वधर्मियांनी सण अतिशय शांततेने आणि घरातच साजरे केले. दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी केले आहे.