विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा- जयंत पाटील यांचे आवाहन, जलसंपदा मंत्र्यांचा अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कृषी प्रगतीची प्रत्यक्ष पहाणी Farmers in Vidarbha should use water properly - Jayant Patil's appeal, Water Resources Minister's study tour interaction with farmers

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा- जयंत पाटील यांचे आवाहन

जलसंपदा मंत्र्यांचा अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद 

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कृषी प्रगतीची प्रत्यक्ष पहाणी

चंद्रपूर, दि. 28 : गोसीखुर्द प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विनियोग विदर्भातील शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा करावी. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर प्रगत झाली आहे. या बाबींचा दौऱ्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास करुन त्याप्रमाणे आपल्या भागात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचा विशेष प्रकल्पांतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांचा शेतकरी समृध्दी अभ्यास दौरा सध्या सुरु असून या दौऱ्यात सहभागी झालेल्या नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखाना येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशिष देवगडे , अधिक्षक अभियंत जगत टाले, प्राध्यापक सुरेश महिंद, सांगली जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव माने यावेळी उपस्थित होते. 
ऊसाची शेती किती उत्तमरित्या करता येते याचे उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे. या भागातील शेतकरी हा स्वबळावर समृध्द झाला आहे. स्वत: कष्ट करुन व कर्जे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शासनाने टेंभू, ताकारी, म्हैसाळ यासारख्या उपसा सिंचन योजना राबवून जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आणली आहे. असे सांगून श्री. जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता मोठी असली तरी या भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्याचबरोबर यांत्रिक शेतीलाही प्राधान्य देऊन उत्तम दर्जाची शेती केली आहे. केवळ एक शेतकऱ्याचे हित न जोपासता सामुदायीकपणे सिंचन योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच शेतकऱ्यांनी परस्परात योग्य संवाद ठेवला. सिंचन योजना योग्य पध्दतीने चालविल्या या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्च संस्थांना वेळेत भरुन त्या सक्षम ठेवण्यास मदत केली. त्यामुळे आज या भागाचे नंदनवन झाले आहे. शेतीतील प्रगतीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे. 
सांगली जिल्ह्यात ऊस शेतीबरोबरच येथील कष्टकरी शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब अशा फळबागा मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या, त्याचबरोबर आता आंबाही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. तसेच शेतीमध्ये नवनविन प्रयोगही येथील शेतकरी करत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, विदर्भातून अभ्यास दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींची बारकाईने पाहणी करावी. तसेच तज्ञ शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन ते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. शासन विदर्भाच्या विकासासाठी शाश्वत सिंचनावर भर देत आहे. गोसीखुर्द प्रकल्प हा त्याचेच एक उदाहरण असून गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून अनुभव, ज्ञान घेवून आपल्याही भागात या पध्दतीचे प्रयोग करावेत. याबाबी करत असताना विदर्भातील शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल. पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नंदनवन विदर्भातही फुलावे यासाठी शेतकऱ्यांनी या दौऱ्यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा. जलसंपदा विभागाने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून दौऱ्यावर आलेल्या सर्व शेतकऱ्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
श्री राजेंद्र मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांनी या भागात राबविण्यात येत असणाऱ्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांची बारकाईने पाहणी करावी. तसेच या संस्थांच्या चालणाऱ्या कामाबाबतही माहिती जाणून घ्यावी. पाणी पुरवठा संस्थांनी पाणी पट्टी व दुरुस्ती देखभाल खर्च वेळीच भरल्याने या संस्था जोमाने सुरु आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनीही याही बाबींचा बारकाईने अभ्यास करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

प्रास्ताविकात मुख्य अभियंता अशिष देवगडे म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य पध्दतीने वापर व्हावा, शेतकऱ्यांना पीक पध्दतीची माहिती व्हावी, पाणी पुरवठा योजना चालविण्याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आणण्यात आले आहे. या दौऱ्यात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची या ठिकाणी पाहणी करावी. तसेच स्वत:साठी उद्भविलेल्या शंकांचे येथील अनुभवी व तज्ज्ञांकडून निराकरण करुन घ्यावे. पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे. त्याच धर्तीवर विदर्भातही प्रगती व्हावी. यासाठी शेतकऱ्यांचा हा अभ्यास दौरा महत्वपुर्ण आहे. यात जास्तीतजास्त माहिती तंत्रज्ञान तसेच शेतीतील नवनविन प्रयोग, संकल्पना शेतकऱ्यांनी जाणून घ्याव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना प्रतिमा देऊन आभार मानले. बेलारी गोसीखुर्द येथील शेतकरी नारायण शिवनकर, वडाळा कालावा गोसीखुर्द येथील शेतकरी अजय ननावरे, उर्मीगाव भंडारा येथील शेतकरी ईश्वर भुते यांनी मनोगत व्यक्त केले. श्री जगत टाले यांनी आभार मानले. 

Farmers in Vidarbha should use water properly - Jayant Patil's appeal, Water Resources Minister's study tour interaction with farmers.