चंद्रपुर जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये काही बाबींमध्ये शिथिलताजाणून घेवूया; काय सुरू,काय बंद राहणार


 

चंद्रपूर, दि. 1 जून: जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात  कलम 144 लागू असणार आहे.

या बाबी बंद राहतील:
प्रवास :
आंतरराज्य व आंतरजिल्हा विनापरवाना प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल.परराज्यात / राज्यातर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता http://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.

चंद्रपूर जिल्हा बाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभाग यांचेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 14 दिवस होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती इतरत्र फिरताना आढळल्यास रुपये 2 हजार दंड व मास्कचा वापर न केल्यास रुपये 200 इतका दंड आकारण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 188, 269,270 ,271 नुसार कार्यवाही करण्यात येईल.

65 वर्षावरील व्यक्ती,मधुमेह व्यक्ती व 10 वर्षाचे आतील बालके गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशा शिवाय घराबाहेर निघू नये.

अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी/ अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.

सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये.धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणुच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅली, सामूहिक कार्यक्रम ,समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव ,उरूस ,जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने यांना मनाई राहील.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.

शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे ,क्लब /पब, क्रीडांगणे, मैदाने,जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे ,शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील.

निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल /लॉज /खाजगी विश्रामगृह बंद राहतील. सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.तसेच,सलुन,स्पा, बार्बरशॉप ,ब्युटी पार्लर, केस कर्तनालय बंद राहतील.

जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:-

अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध /दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री/ वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध,दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, आपले दुकान आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना/दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना/दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 05 या वेळेत सुरु राहतील व रविवार ला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील. परंतु, आपले दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत/ग्रामपंचायत यांचेकडुन प्राप्त झालेले परवानाधारक फेरीवाले यांची ठेले/ दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील व रविवारला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील.

खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे,भाजीपाला,अंडी, मांस ,मासे यांची वाहतुक व साठवण.अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहे, खाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केट फरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.

पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्री, रेनकोट, प्लॅस्टिक शीट, कव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे.त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:
लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतु, सदर परवानगीही उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील.तसेच,अंत्यविधी करिता सामाजिक अंतर राखून 20 लोकांचे उपस्थितस परवानगी राहील.

प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.
जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यात (दुचाकी /चारचाकी वाहनाने) नागरिकास कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतु, चारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ दोन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सँनीटायझर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकीचालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असेल.

महानगरपालिका ,नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा /ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील
परंतु रिक्षा /ऑटोरिक्षा मध्ये सँनीटायझर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.
दुचाकी चारचाकी रिक्षा ऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय महामंडळ कार्यालय शंभर टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाकडून दिनांक 17 एप्रिल 2020 रोजीच्या अधिसूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:
सर्व प्रकारचे शीतगृहे /वखार ,गोदामा संबंधित सेवा /घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी.कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,-विक्री आस्थापना /दुकाने कार्यरत राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे /यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने /आस्थापना (किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.
शेती संबंधित यंत्रे /अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग /केंद्र. खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग/ आस्थापना /दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णता बंद राहील.

उपरोक्त प्रमाणे परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण,सार्वजनिक स्थळे,दुकाने आस्थापना, प्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारांस,कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक  यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.

सदरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188,269,270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

सदरचा आदेश संपुर्ण जिल्हयामध्ये दिनांक 1 जून  ते दिनांक 30 जून या कालावधीकरिता लागू राहील.तसेच, प्रतिबंधीत क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागु राहणार नाही.