चंद्रपुर शहर महानगर पालिका हद्दतील पूर रेषा रद्द करा :- खा. बाळू धानोरकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र #Chandrapur #CMC #BaluDhanorkar

चंद्रपुर शहर महानगर पालिका हद्दतील पूर रेषा रद्द करा :- खा. बाळू धानोरकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपुर : चंद्रपुर शहरात १९८६ मध्ये आलेल्या पुरानंतर सिंचाई विभागाच्या वतीने पूर रेषा आखण्यात आली. यावेळी इरई नदीच्या पश्चिम क्षेत्रातील भागाला पूर रेषेखाली घोषित करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रात नव्या बांधकामाला मनपातर्फे बंदी घालण्यात आली आहे.

 परिणामी मनपाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे पूर रेषा रद्द करण्यात यावी, असे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. 

 १९८६ मध्ये चंद्रपुरातील इरई धरण व गडचिरोली जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे नियोजनापूर्वी खोलण्यात आले. त्यामुळे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. यावेळी मनपा हद्दीमध्ये पूर रेषा ठरविण्यात आली. 

चंद्रपूर शहरातील जास्तीत जास्त भाग इरई नदीच्या किनाऱ्यावर वसला आहे. इरई धरणाच्या परिसरात अनेकांचे प्लाट आहेत. अनेकांनी येथे घरकुल बांधण्याचे स्वप्न बघितले आहे. काहींना घरकूल मंजूरही झाले आहे. मात्र मनपातर्फे त्यांना तेथे बांधकाम करण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे.

 याव्यतीरिक्त इतर परिसरातील जागा खरेदी करणे जनसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. मात्र इरई नदीच्या पश्चिम क्षेत्रातील भाग पूर रेषामध्ये समाविष्ट असल्याचे कारण देत मनपा बांधकामाला बंदी घालत आहे. याचा फटका जनसामान्यासोबतच मनपालासुद्धा बसत असून मनपाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. 

केवळ मानवाच्या चुकीमुळे आलेल्या पुराचा फटका जनसामान्यांना बसला असून त्यांच्या जमिनी मातीमोल झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील पूर रेषा रद्द करण्यात यावी, असे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.